सत्ता स्थापनेचा तिडा सुटला
सोनिया गांधींचं मन वळवण्यात यश, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याची पत्रं
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याची पत्रं देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आता महासेनाआघाडीचं सरकार येणार आहे

नवी दिल्ली : काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचं मन वळवण्यात पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना यश आलेलं आहे. काँग्रेस शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्यास राजी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंब्याची पत्रं देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आता महासेनाआघाडीचं सरकार येणं जवळपास निश्चित आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १७ तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. यावेळी शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, तर बहुमत सिद्ध करताना काँग्रेस बाहेरुन पाठिंबा देईल. त्यामुळे महाराष्ट्रावर असलेलं राष्ट्रपती राजवटीचं संकटही 19 व्या दिवशी टळलं आहे.

राष्ट्रवादीने 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला फॅक्सद्वारे पाठवलं आहे. हे पत्र शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे राज्यपालांना सादर करतील.
विधानसभा अध्यक्षपदाचा मान काँग्रेसला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, तर दोन उपमुख्यमंत्री प्रत्येकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असतील. विशेष म्हणजेच उद्याच मंत्रिमंडळाचा शपथविधीही होण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधींचं मतपरिवर्तन
महाराष्ट्रातील आमदारांशी चर्चेनंतर सोनिया गांधींचं मत बदललं. शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधी तयार नव्हत्या. दिवसभर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढली. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार, राजीव सातव अशा नेत्यांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली.
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद, आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदं?
सोनिया गांधी यांनी जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेस आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. काँग्रेसच्या 44 आमदारांपैकी 40 जणांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास जोर धरल्यामुळे सोनिया गांधींनी होकार भरल्याची माहिती आहे.
विरोधी विचारधारेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यास इतर राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसची अडचण होईल, अशी सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची धारणा होती. त्यानंतर शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा झाली. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही फोनवरुन सोनिया गांधींशी संवाद साधला. अखेर गांधी कुटुंबाने सकारात्मकता दर्शवली.
राष्ट्रवादीचा आतून तर काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा
