अवैध गांजाच्या वाहतुक करत असलेल्या ३ महिला व १ पुरुष यांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी १४ किलो गांजा सह अटक …
चोपडा(प्रतिनिधी)-मध्यप्रदेशातून आणल्या जाणाऱ्या अवैध गांजाच्या वाहतुकीवर चोपडा ग्रामीण पोलिसांनी यशस्वीरित्या कारवाई करून संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.या कारवाईने चोपडा ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन होत आहे.गुप्त बातमीद्वारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.कारवाईत चार जणांना ताब्यात घेतले असून यात ३ महिला व १ पुरुष यांचा समावेश आहे. संशयित आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल १४ किलो ५१८ ग्रॅम वजनाचा, ३ लाख १९ हजार ३९६ रुपयांचा गांजा जप्त केलाआहे.

याबाबत सविस्तर असे की,३० ऑक्टोबर २०२५ रोजी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सत्रासेन ते लासूर या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली.सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता संशयित चार जणांना नाटेश्वर मंदिराजवळ थांबविण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या पिशव्यांची तपासणी केल्यावर मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला.पोलीस पथकात पोहेकॉ शशिकांत पारधी, रत्नमाला शिरसाठ,चेतन महाजन यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी : जतिन बबन जावळे (२२, कांदिवली, मुंबई), संताबाई मनोहर गवारे (७०), शांताबाई पंडरी सुमरपल्ली (७२) आणि राधाबाई लक्ष्मणराव सोनवणे (७८,सर्व रा. भिमनगर,परभणी) या चौघांकडून मिळून १४ किलो ५१८ ग्रॅम वजनाचा गांजा, एकूण किंमत ३ लाख १९ हजार ३९६ रुपये, तसेच तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम १०२० रुपये असा एकूण ३ लाख ३६ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश टाक हे करीत आहेत.

